मुंबई : पुढारी ऑनलाईन
अभिनेता धैर्य घोलपने गेल्या वर्षी तान्हाजी चित्रपटात बॉलिवूड डेब्यू केला होता. तान्हाजी मालुसरेंच्या सैन्यातल्या मावळ्याच्या रूपातल्या धैर्यने या सिनेमात नवाब सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. आता धैर्य घोलप कलर्सच्या नव्या शो ‘बावारा दिल’व्दारे ‘सरकार’ या खलनायकाच्या भूमिकेतून टेलिव्हिजन डेब्यू करत आहे.
तान्हाजीमधील सैफ अली खान यांच्या निर्दयी उदय भान सिंह या भूमिकेकडून ‘सरकार’ या खलनायकी पात्रासाठी प्रेरणा घेतल्याचे धैर्य सांगतो.
धैर्य घोलप म्हणतो, “मला नेहमीच नकारात्मक पात्रांबद्दल आकर्षण वाटतं आलंय. याचे कारण खलनायकी भूमिकांमध्ये भावनांच्या अनेक छटा साकारायला मिळतात. आपल्यातल्या अभिनेत्याचा त्यामुळे कस लागतो, असं मला वाटतं. तान्हाजीमधली उदय भान ही भूमिका ओम राऊत सरांच्या मार्गदर्शनाखाली सैफ सर कशी साकारत होते. हे मला पाहायला मिळाले. सैफ सरांना भूमिकेशी एकमग्न होताना त्यांची तयारी बारकाईने न्याहाळायची संधी मला मिळाली. त्याचा फायदा ‘सरकार’ ही भूमिका रंगवताना होत आहे.”
धैर्य सांगतो, “माझ्या करियरच्या सुरूवातीलाच नकारात्मक भूमिका साकारण्याची संधी मला मिळतेय, यासाठी मी निर्माते निखिल शेठ आणि कल्याणी पाठारे यांचा आभारी आहे.”