सातारा : प्रतिनिधी
मतदानापूर्वी मतदान केंद्रावर हाताच्या बोटावर लावल्या जाणार्या शाईबाबत सर्वसामान्यांमध्ये अप्रुप असते. ही शाई कोठून आणली जाते, कशी बनवली जाते? याचा वापर कुठे कुठे होतो? असे अनेक प्रश्न त्यांना सतावतात. सर्वप्रथम 1962 मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शाईचा पहिल्यांदा वापर करण्यात आला. ही शाई म्हैसूरवरून संपूर्ण देशात पाठवली जाते. 2009 मध्ये झालेल्या निवडणुकीत देशात शाईच्या 19 लाख बाटल्या तर 2014 च्या निवडणुकीत संपूर्ण देशात 25 लाख बाटल्या लागल्याचा अंदाज आहे. यावेळी मात्र मतदार वाढल्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणात शाईची गरज भासणार आहे.
सर्वप्रथम 1962 मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शाईचा वापर करण्यात आला. यानंतर देशात होणार्या प्रत्येक निवडणुकीत शाईचा वापर होऊ लागला. हे एक क्रांतिकारक पाऊल होते. यावेळी देशातील काही भागात बोगस मतदान होत असल्याच्या घटना घडत होत्या. या घटना थांबवण्यासाठी या पद्धतीचा उपयोग करण्यात आला. या शाईच्या 10 एम.एल. असलेल्या एका बाटलीची किंमत त्यावेळी 183 रुपये एवढी होती. 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत 16 लाख 7 हजार शाईच्या बाटल्या लागल्या. यावेळी 5 एमएलची एक बाटली होती.
एका बाटलीमध्ये 700 ते 800 मतदारांना लागेल एवढी शाई असते. या शाईचे पेटंट भारत सरकारने गुप्त ठेवले आहे. ही शाई तयार करण्यासाठी राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेची महत्त्वाची भूमिका आहे. या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट आणि अल्कोहोल यांचे मिश्रण असते, असेही काही जानकार सांगतात. ही शाई बोटावर लावताच 15 सेकंदामध्ये तिचा ओलसरपणा नष्ट होतो. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी ती पुसली जात नाही. ही शाई म्हैसूर येथील एका कंपनीमध्ये तयार केली जाते. ही कंपनी कर्नाटक सरकारच्या अंतर्गत येते. देशात ही एकमेव कंपनी असून या कंपनीला शाई निर्माण करण्याचा आणि ती विकण्याचा अधिकार आहे. ही कंपनी जगातील 25 देशांना निवडणुकीसाठी शाई विकते. भारत सरकारसुद्धा निवडणुकीसाठी शाईचा पुरवठा करण्याचे कंत्राट याच कंपनीला देत असते. म्हणूनच निवडणुकीत वापरल्या जाणार्या या शाईला म्हैसूरची शाई म्हणून ओळखले जाते.