पिंपरी : प्रतिनिधी
हिंजवडी येथील टीसीएस या आयटी कंपनीतील कर्मचार्याने कंपनीतच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 3) सकाळी उघडकीस आली. कपिल विटकर (39, रा. वडाची वाडी, उंड्री, पुणे) असे आत्महत्या केलेल्या कर्मचार्याचे नाव आहे.
हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल विटकर हे हिंजवडीतील टीसीएस कंपनीमध्ये असोसिएट पदावर काम करत होते. त्यांनी मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सहाव्या मजल्यावर जाऊन बॅगेचे लॉक करण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक टॅग एकत्र करुन त्याने गळफास घेतला. कपिल यांचे लग्न झाले असून, ते उंड्री येथे राहण्यास होते. त्यांचा मागील महिन्यात अपघात झाला होता.
तेव्हापासून त्यांना पाठदुखीचा त्रास होता. या कारणामुळे मागील काही दिवासांपूर्वी ते सुट्टीवर देखील होते. या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. मात्र, कपिल हे आत्महत्या करू शकत नाही. त्यांचा मृत्यू हा संशयास्पद असून, त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे. कपिल यांचा उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.