बागपत : पुढारी ऑनलाईन
वीज विभागाकडून अनेकवेळा गलथान कारभार केला जातोच, पण बऱ्याच वेळा त्यांच्याकडून आकारण्यात येणाऱ्या बिलावरूनही बरीच चर्चा होत असले. त्यामुळे वीज विभागाला अनेक शुद्ध शब्दात लाखोळ्या वाहण्यात येतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशमधील बागपल जिल्ह्यातील बरनावा गावातील एका झोपडीत राहणाऱ्याच्या बाबतीत झाला आहे.
एका बल्बच्या वीज बीला पोटी वीज वितरण कंपनीने त्याला तब्बल ४६ लाखांचे बील पाठवले आहे. यामुळे त्या व्यक्तीच्या पायाखालील जमीनच सरकली आहे. इतकेच नाही तर वीज वितरण कंपनीने त्याच्या झोपडीचे वीज कनेक्शनही कापले. याबाबत जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली, तेव्हा त्यांनी या प्रकाराला कारकुनाची चूक होती, असे म्हणत बिलिंग कारकुनाला निलंबित केल्याचे सांगितले.
याशिवाय उपविभागीय अधिकारी यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. हे प्रकरण बागपतमधील बरनावा गावचे आहे. एक बल्ब असणाऱ्या झोपडीत राहणाऱ्या, मोलमजूरी करणाऱ्या यशपाल यांना वीज बिल पाहून धक्काच बसला. मी सौभाग्य योजनेतंर्गत वीज कनेक्शन घेतले. ज्यात एक किलोवॅट वीज मोफत आहे. परंतु, ४६ लाखांचे वीज बाल पाहून मला आश्चर्य वाटत असल्याचे यशपाल यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, 'मी याप्रकरणी वीज विभागाच्या अधिका ऱ्यांकडे गेलो होतो, पण याप्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही. त्यांनी उलट माझे वीज कनेक्शन कापले. पण जेव्हा मी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ठेवली, तेव्हा त्यांनी पुन्हा कनेक्शन जोडले. याबाबत पीव्हीव्हीएनएलचे एमडी अरविंद बंगारी यांना विचारले असता त्यांनी, याप्रकरणी बिलिंग कारकून देवेंद्रसिंग यांना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणात दुर्लक्ष केल्याबद्दल उपविभागीय अधिकाऱ्यांना नोटीस पाठविली आहे, असे सांगितले.