मुबंई : पुढारी ऑनलाईन
सध्या राज्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. केंद्र सरकार आपल्याला मदत करत आहे. राज्य सरकार कोरोनाशी दोन हात करताना नवे नियम लावत आहे. याचा त्रास सर्वांचा होतो, पण संकटच असे आहे की आपल्याला दोन हात केले पाहिजेत. परस्थिती गंभीर आहे, पण आपण धैर्याने सामोरे जावू, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केले.
वाचा : ‘ट्रकभर पुरावे’, ‘पाठीत खंजीर’ ते... शरद पवारांवरील आरोपांचे पुढे काय झाले?
पवार म्हणाले, कोरोनाचे संकट माठे आहे. कोरोना घालविण्यासाठी केंद्र सरकार या संकटातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकारला मदत करत आहे. कालच मी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मला आश्वस्त केले आहे. या संकटात केंद्राचे आरेग्य खाते राज्याच्या पाठीशी असेल. त्यांची मदत आणि सामूहिक प्रयत्न यातून आपल्याला पुढे जायचे आहे.
आपल्यावर बंधने आणली की अस्वस्थता येते, शेतकरी, कामगार, व्यावसायिक, हमाल, कष्टकरी, व्यापारी यांना संकटामुळे झळ बसली आहे. दुकाने बंद झाल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्याला आपल्या मालाचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वांचेच अपरिमित नुकसान होत आहे. यशाचा मार्ग काढायचा असेल तर सगळ्या परिस्थितीला धैर्याने सामोरे गेले पाहिजे, याला पर्याय नाही. सगळ्या घटकांना विनंती आहे की, आपल्याला वास्तव नाकारून चालणार नाही. जनतेच्या जीवासाठी, सुरक्षिततेसाठी राज्य सरकारला काही निर्णय घ्यावे लागतील, राज्य सरकार ते घेत आहे, यासाठी सर्वांनी सहकार्य करायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.
वाचा : संजय वाझे लेटरबॉम्बवर संजय राऊत म्हणाले...
या परिस्थितीला सामोरे जाताना सरकारला आलेल्या सूचना स्वीकारून निर्णय घेतले जात आहेत. ते निर्णय राबविण्यासाठी सहकार्य गरजेचे आहे. त्यासाठी प्रसारमाध्यमे, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती आहे की, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारला सहकार्य केले पाहिजे. सामूदायिक प्रयत्नातून आपण कोरोना घालवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.