कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन
संचारबंदी आणि जमावबंदी सुरू असताना कोल्हापूरकरांना भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर पडावे लागत होते. काही ठिकाणी भाजी घेण्यासाठी गर्दी होतानाही दिसत होती. मात्र, ही गर्दी रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने उपाययोजना केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरिकांनी एकाच ठिकाणी गर्दी करू नये, यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने भाजी विक्रीची ठिकाणे निश्चित केली आहे. त्याचबरोबर, महापालिकेने विशेष सूचना केली आहे की, ही भाजी विक्रीची ठिकाणे नियमितपणे सुरू राहणार असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये.
कोल्हापूर महापालिका आयुक्त आणि महापौर निलोफर आजरेकर यांच्याकडून नागरिकांना कळवण्यात आले आहे की,
- सध्या मार्केटमध्ये गर्दी होत असल्याने मार्केट बाहेरील रस्त्यावर दोन विक्रेत्यांमध्ये १५ फूट अंतराचे स्थान निश्चित केले आहे. विक्रेत्यांनी त्याच ठिकाणी बसावे.
- भाजी विक्रेते यांनी आपल्या स्टॉलसमोर ५ फूट इतक्या अंतराचे पट्टे मारावेत. दोन पट्ट्यांच्या मध्ये कोणासही उभे राहण्यास परवानगी नाही. ग्राहकांनी रांगेमध्येच उभे राहून खरेदी करावी.
- भाजी विक्रेते यांनी हातगाडीद्वारे किमवा टेम्पोद्वारे भाजी विकण्यास परवानगी दिली जाईल. त्यामुळे घरासमोर भाजी मिळण्यास मदत होईल.
- भाजी विक्रीची वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ७ ही राहील. त्यामुळे कोणीही एकाच वेळी भाजी खरेदीस गर्दी करू नये.
- एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीने भाजी खरेदीस यावे.
- शक्यतो आठवड्यातून दोनच वेळा भाजी खरेदीस यावे.
- भाजी विक्रेते यांना याव्यतिरिक्त मुख्य चौकात साथ रोग कालावधीसाठी भाजी विकण्यास परवानगी आहे.