मुंबई : पुढारी ऑनलाईन
कोल्हापूर आणि सांगलीला भीषण महापूराने वेढा घातल्याने अतिगंभीर परस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा विळखा कर्नाटकमधील अलमट्टी धरण कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्याशी चर्चा करून अलमट्टीमधून पाण्याचा विसर्ग करण्यास विनंती केली. महाराष्ट्र सरकारकडून विनंती करण्यात आल्यानंतर कर्नाटक सरकार अलमट्टीमधून ५ लाख क्युसेक पाणी सोडण्यासाठी सहमत झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना सांगितले.
अलमट्टी धरणातील पाणीसाठी आणि बॅक वॉटरमुळे सांगली जिल्हा निम्मा पाण्याखाली गेला आहे. त्याचे भयंकर पडसाद कोल्हापूर जिल्ह्यातही उमटले आहेत. त्यामुळे महापूराची पाहणी करून आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुरस्थितीची पाहणी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून सर्वोतेपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचेही सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.