कोल्हापूर : सुनील कदम
कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात आजघडीला वेगवेगळ्या कंपन्यांचे शेकडो मोबाईल टॉवर आहेत. मात्र, यापैकी बहुतांश टॉवर हे आरोग्याच्या द़ृष्टीने धोकादायक तर आहेतच, शिवाय त्यांची उभारणीही बेकायदेशीर पद्धतीने झाल्याचे दिसते.
मोबाईल टॉवरमधून ज्या विद्युत चुंबकीय लहरी बाहेर पडतात, त्या मानवी आणि अन्य जीवितमात्रांच्या द़ृष्टिकोनातून अत्यंत धोकादायक असतात. मोबाईल टॉवरमधून निघणार्या विद्युत चुंबकीय लहरी या जमिनीशी समांतर जात असल्या तरी त्या काँक्रीट भिंतीनाही भेदून आरपार जाणार्या असल्यामुळे कालांतराने अनेक रोग व व्याधींना जन्म देतात, असे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकार, टेलिकॉम विभाग, पर्यावरण खाते इत्यादींनी टॉवर उभारणीसंबंधी अनेक अटी, निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली आहेत. मात्र, जिल्ह्यातील मोबाईल टॉवर्सची सद्यस्थिती विचारात घेता बहुतांश टॉवर्सची उभारणी नियम आणि कायदे पायदळी तुडवून झाल्याचे जाणवते.
मोबाईल टॉवरबाबत मार्गदर्शक तत्त्वे!
शैक्षणिक संस्था व इस्पितळांच्या परिसरात मोबाईलचे टॉवर बसवू नयेत. कारण त्यामुळे मुलांना व आजारी व्यक्तींना कमी प्रतिकार शक्तीमुळे किरणोत्सर्गाचा त्रास संभवतो. चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये मोबाईल टॉवर्स बसवू नयेत. कारण नैसर्गिक आपत्तीत ते अधिक धोक्याचे ठरू शकतात. टॉवरचा अँटेना रहिवाशी इमारतीच्या दिशेने ठेवू नये.अँटेना जमिनीपासून तसेच छतापासून तीन मीटर उंचीवर बसवावा.
लोकांना टॉवरजवळ जाता येऊ नये म्हणून टॉवरजवळ जाण्याचा मार्ग बंद करावा. टॉवरजवळ धोक्याची सूचना असलेले फलक लावणे बंधनकारक आहे. टॉवरसंबंधी कामे करणार्या कामगारांना विद्युत चुंबकीय संरक्षण देणे आवश्यक आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी!
टॉवरसाठी जागा निवडताना वनक्षेत्राला प्रथम प्राधान्य द्यावे. द्वितीय प्राधान्य निवासी भागापासून दूर असलेल्या मोकळ्या जागेस द्यावे. जेव्हा निवासी भाग टाळणे शक्य नसेल, त्यावेळी मोकळ्या जागेत रहिवाशांची संमती घेऊनच टॉवर उभारणीस परवानगी द्यावी. टॉवर उभारणीसाठी इस्पितळे, शैक्षणिक संस्था व निवासी भाग टॉवरपासून 100 मीटर क्षेत्रात येत असल्यास परवानगी नाकारावी. टॉवरमुळे होणार्या हानी वा दुखापतीस संबंधित मोबाईल कंपनीस जबाबदार धरले जावे व त्याची नुकसानभरपाई देणे त्यांच्यावर बंधनकारक होते. या शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्थानिक सोयीनुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.
मोबाईल टॉवरच्या विद्युत चुंबकीय लहरींचा पक्ष्यांवर परिणाम होतो, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. आता फाईव्ह-जी तंत्रज्ञान सुरू झाल्यानंतर टॉवरच्या लहरींचा मानवी आणि पशुपक्ष्यांच्या जीवनावर आणखी विपरीत परिणाम होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
- डॉ. मधुकर बाचूळकर,
पर्यावरण तज्ज्ञ