मुंबई : पुढारी ऑनलाईन
प्रसिध्द अभिनेते मनोज कुमार ८२ वर्षांचे झाले. २४ जुलै, १९३७ रोजी एबटाबाद (आताचे पाकिस्तान) मध्ये जन्मलेले मनोज कुमार यांनी आपल्या सौम्य आणि दमदार अभिनय शैलीने एक नवी ओळख बनवली. उत्तम अभिनयाबरोबर एक खास गोष्ट अशी की, बहुतांशी चित्रपटांमध्ये त्यांचे नाव भारत असे होते. त्यामुळे चाहते त्यांना 'भारत कुमार' असे म्हणू लागले. देशप्रेमी अभिनेता आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांच्याविषयी या खास गोष्टी जाणून घेऊया.
दिलीप कुमार यांचा चित्रपट पाहून बदललं होतं नाव
मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असे होते. शाळेत शिकत असताना एक दिवस मनोज 'शबनम' हा चित्रपट पाहायला गेले. दिलीप कुमार यांचा अभिनय त्यांनी पाहिला आणि त्यांच्या भूमिकेवरून आपले नाव मनोज कुमार असे ठेवले.
फाळणीनंतर भारतात आले
मनोज कुमार यांचे कुटुंबीय भारत-पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तान सोडून दिल्ली आले होते. त्यावेळी मनोज कुमार १० वर्षांचे होते. त्यांचे कुटुंबीय दिल्लीमध्ये राहू लागले. त्यांनी दिल्लीमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले.
फॅशनमधून बॉलिवूडमध्ये पाऊल
मनोज कुमार यांनी १९५७ मध्ये रिलीज झालेला चित्रपट ‘फॅशन’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘फॅशन’मध्ये त्यांनी एका भिकाऱ्याची खूप छोटीशी भूमिका साकारली होती. ‘कांच की गुडिया’ (१९६०) मध्ये मनोज कुमार यांनी पहिली मुख्य भूमिका साकारली होती. १९६० च्या दशकात रोमँटिक चित्रपट 'हरियाली और रास्ता’, ‘दो बदन’ के अलावा ‘हनीमून’, ‘अपना बना के देखो’, ‘नकली नवाब’, ‘पत्थर के सनम’, ‘साजन’, ‘सावन की घटा’ तर सामाजिक चित्रपट - ‘अपने हुए पराये’, ‘पहचान’ ‘आदमी’, ‘शादी’, ‘गृहस्थी’ और ‘गुमनाम’, ‘वो कौन थी?’ यासारखे एकापेक्षा एक चित्रपट केले.
देशप्रेमाची जागृती
मनोज कुमार यांनी देश प्रेम जागृतीपर चित्रपट बनवले. 'शहीद', 'उपकार', पूरब और पश्चिम' 'क्रांति' असे चित्रपट केले. चित्रपटातील अमूल्य योगदानासाठी मनोज कुमार यांना दादासाहेब फाळके, पद्मश्री, फिल्मफेअर लाईफ टाईम अचीव्हमेंट यासारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.