मंगळवेढ : तालुका प्रतिनिधी
मंगळवेढा तालुक्यात सन 2012-13 व 2013-14 या वर्षात दुष्काळ पडल्याने शासनाने जनावरांना चारा पुरविण्यासाठी छावण्या उघडल्या होत्या. या छावण्यात गैरप्रकार घडू नयेत. यासाठी जिल्हाधिकारी यांनी जनावरांना बारकोड पध्दतीचा नियम लावला होता. मात्र छावणी चालकांनी या नियमाचा भंग केल्याने चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
यात प्रामुख्याने श्री संत दामाजी कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक चंद्रशेखर सिध्दगिरेण्णा हुबळी तसेच सुखदेव साळुंखे (दोघे रा.पंढरपूर) यांच्यासह तिघांविरूध्द गुन्हे दाखल झाले आहेत.
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याकडून तत्कालीन कार्यकारी संचालक चंद्रशेखर हुबळी व सुखदेव साळुंखे हे नंदुर, कात्राळ, कागष्ट, मुंढेवाडी येथे तर सोमलिंग ग्रामीण विकास मंडळ, गुंजेगाव येथील चालक अंकुश रामा चौगुले (रा.कागष्ट), सहारा सामाजिक संस्था, बोराळे येथील चालक विनोद प्रभाकर पाटील, पुज्य भिमराव आप्पाराव पाटील ट्रस्ट, बोराळे येथील छावणी चालक भिमराव विठ्ठल पाटील, बहुजन बहुउद्देशीय सामाजिक संस्था, अरळी येथील चालक राजकुमार बाळकृष्ण कोळी आदींनी छावण्यांमधील जनावरांना बारकोड लावले नाहीत. परिणामी जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचा भंग झाला. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्याने न्यायालयाच्या आदेशाने वरील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याची फिर्याद बोराळे मंडलचे मंडल अधिकारी जितेंद्र मोरे यांनी वरील पाच छावणी चालकांविरूध्द फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास सहाय्यक फौजदार एम.बी.जमादार हे करीत आहेत.