पंढरपूर : प्रतिनिधी
उजनीच्या पाण्याचे समान वाटप झाले पाहिजे. जिल्ह्यातील प्रत्येक शेतकर्याचे किमान 5 एकर क्षेत्र बागायती झाले पाहिजे. उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता लक्षात घेता योग्य नियोजन केले तर हे शक्य असल्याचे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी त्यांनी व्यक्त केले.
चिंचणी ( ता. पंढरपूर) येथे वरदायिनीमाता मंदिर कलशारोहण, मूर्ती प्राण प्रतिष्ठापना, आर.ओ. प्लॅन्टच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर डॉ. शलाका पाटणकर, सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे, माढा पं.स.चे माजी सभापती रणजितसिंह शिंदे, श्रमिक मुक्तीदलाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट, शंकर सावंत, नामदेव सावंत, संपत देसाई, मिलींद पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी भारत पाटणकर यांनी धरणग्रस्तांच्या विविध प्रश्नांविषयी कायम लढे उभारले, संघर्ष करून विस्थापितांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. मात्र सध्याचे सरकार शेतकरी विरोधी असून अवघ्या एक रुपया किंमतीत उद्योगपतींना फुकट जमिनी देऊन शेतकरी, कामगारांची पिळवणूक करत असल्याचे सांगितले.
यावेळी प्रास्ताविक करताना श्रमिक मुक्तीदलाचे जिल्हाध्यक्ष मोहन अनपट यांनी , गाव 100 टक्के निर्मलग्राम करत रस्ते, पाणी, गटार योजना आदी भरीव विकास योजना राबविल्या. पावसाचे वाहून जाणारे पाणी रेन हार्वेस्टिंगद्वारे जिरविण्याचा प्रकल्प उभा केला. बचत गट, दूध संकलन केंद्र यांच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास केल्याचे सांगितले.
यावेळी सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे, माढा पं.स.चे माजी सभापती रणजितसिंह शिंदे, कॉ.संपत देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने चिंचणी, पिराची कुरोलीसह तालुक्यातील धरणग्रस्त नागरिक, महिला उपस्थित होते.