सांगली : प्रतिनिधी
डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्यानंतर राज्यातील आणखी एका पुरोगामी नेत्याच्या हत्येचा कट आखला गेला आहे; ही माहिती पोलिस तपासातच पुढे आली आहे, तरीही पोलिस खाते व सरकार खंबीर भूमिका घेण्यास तयार नाही, असा आरोप अंनिसचे राज्य सरचिटणीस हमीद दाभोलकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ते म्हणाले, दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येला 55 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. तरीही तपास योग्य पद्धतीने होत नाही. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्यांबाबतही गंभीरपणे तपास केला जात नाही. एसआयटीच्या तपासात पुरोगामी नेत्यांच्या हत्यांतील आरोपी फरार असल्याचे समोर आले आहे; पण त्यांना अटक केली जात नाही. यामुळे अशा संघटनांचे धाडस वाढूू लागले आहे.
ते म्हणाले, कट्टरतावादी संघटना व कार्यकर्त्यांनी राज्यातील आणखी एका पुरोगामी नेत्याच्या हत्येचा कट रचला आहे. ही बाबही उघडकीस आली आहे. तरीही पोलिस काहीही करायला तयार नाहीत. तपास अधिकारी पाच वेळा बदलले जातात, यावरुन सरकार कमालीचे असंवेदशील असल्याचे स्पष्ट होते. अजून किती खून पडण्याची सरकार वाट पाहत आहे?या खुनांचा तपास होण्यासाठी यापुढे आंदोलन अधिक तीव्र केले जाणार आहे. रस्त्यावरील आंदोलनाबरोबरच न्यायालयीन लढाई लढली जाणार आहे. कलबुर्गी यांच्या हत्येबाबत लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.यावेळी प.रा. आर्डे, के.डी. शिंदे, राहुल थोरात, शशिकांत गायकवाड, चंद्रकात वंजाळे उपस्थित होते.
Tags : Sangli, Sangli News, The murder, of another progressive leader, in the state, has been planned