सांगली : प्रतिनिधी
महापालिकेत काँगे्रसची सत्ता असल्याने भाजपने मंत्रालयात विकासनिधी अडवत सूड उगविला आहे. विविध योजनांचा महापालिकेच्या परस्पर शासनपातळीवर वाढीव दराने कारभार करून वाढीव निधी लादला. त्यामुळे अशा भाजपला आता महापालिका निवडणुकीत जागा दाखवा, असे आवाहन काँग्रेसनेत्या जयश्री पाटील यांनी केले. येथील प्रभाग 15 मध्ये सीतारामनगर-विद्यानगर येथे खुल्या भूखंडावर उद्यान उभारणीच्या कामाचे भूमिपूजन श्रीमती पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे संयोजन विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मंगेश चव्हाण, नगरसेवक किशोर लाटणे आदिंनी केले.
श्रीमती पाटील म्हणाल्या, काँग्रेसनेते (स्व.) मदन पाटील व (स्व.) डॉ. पतंगराव कदम यांच्यावर विश्वास ठेवून जनतेने मागील निवडणुकीत काँग्रेसच्या ताब्यात मनपाची दिली. त्यानुसार काँग्रेसने शहर विकासाची कमिटमेंट पाळली. 200 कोटी रुपयांतून रस्ते केले. वीसपेक्षा अधिक ठिकाणी नवीन उद्याने विकसित केली. शहरातील सर्वच प्रमुख रस्ते, उपनगरातील रस्ते काँग्रेसने केले. ती आमची जबाबदारी होती. पण आमदारांनी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून थोडेफार रस्ते केले तर त्याची स्टंटबाजी सुरू केली आहे.
त्या म्हणाल्या, महापालिकेत आयुक्तांच्या माध्यमातून भाजपने रस्तेकामाबाबत केलली अडवणूक आणि नगरसेवकांना बदनाम करण्याचे षङ्यंत्र आता जनतेला माहीत झाले आहे. अशाही परिस्थितीत काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या कुरघोड्यांना पुरून उरले आहेत. मंगेश चव्हाण, किशोर लाटणे यांनी प्रभागात केलेल्या विकासकामांमुळे भाजपला उमेदवारही मिळत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे महापालिकेत पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मंगेश चव्हाण म्हणाले, सर्वाधिक युवकांची फौज काँग्रेसच्या पाठीशी आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरसह सर्वच क्षेत्रात भाजपने महागाईचा आगडोंब उठवला आहे. त्यामुळे भाजपला आता जनता थारा देणार नाही. ए. बी. पाटील, विजय आवळे, राजू यमगर, रविंद्र वळवडे, आकाश वाघ, येडूरकर, टिकारे आदी उपस्थित होते.