सांगली : प्रतिनिधी
आर्मीत नोकरीचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्रस्त झालेल्या एका युवकाने शहरातील स्टेशन चौकातील बीएसएनएलच्या टॉवरवर चढून शोले स्टाईलने आंदोलन केले. नोकरीची लेखी हमी दिल्याशिवाय खाली उतरणार नाही, असा पवित्रा त्याने घेतल्याने यंत्रणांची चांगलीच पळापळ झाली. अनिल हणमंत कुंभार (वय 26, रा. इटकरे, ता. वाळवा) असे त्या युवकाचे नाव आहे. सोमवारी दुपारी बारा ते सायंकाळी पाच असे सुमारे पाच तास हे थरार नाट्य सुरू होते. अधिकार्यांनी लेखी पत्राचे आश्वासन दिल्यानंतर तो सायंकाळी पाचच्या सुमारास खाली उतरला.
कुंभार याचे वडील लष्करात होते. 2013 मध्ये त्यांचे निधन झाले आहे. अनिलने आयटीआयचा वेल्डरचा कोर्स केला आहे. त्याने यापूर्वी आर्मीत भरतीसाठी प्रयत्न केला होता. मात्र, त्याला त्यामध्ये यश आले नाही. त्यामुळे तो निराश झाला होता. सोमवारी सकाळी तो सांगलीत आला होता. त्यानंतर सैनिक कल्याण केंद्रातही तो जाऊन आला.
दुपारी बाराच्या सुमारास तो स्टेशन चौकातील बीएसएनएलच्या कार्यालयात असणार्या टॉवरवर सुरक्षा रक्षकाची नजर चुकवून चढला. तासभर झाला तरी त्याची कोणी दखल न घेतल्याने त्याने टॉवरचा एक नटबोल्ट आणि एक अँगल काढून खाली फेकला. तरीही त्याची कोणी दखल घेतली नाही.
त्यानंतर त्याने मोबाईलवरून शहर पोलिस ठाणे तसेच महापालिकेच्या अग्नीशमन दलाचे अधिकारी एस. एस. देसाई यांना फोन करून आपण टॉवरवर चढल्याचे सांगितले. त्याचा फोन आल्यानंतर पोलिस आणि अग्नीशमन दलाची पळापळ झाली. अग्नीशमन अधिकारी देसाई, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रविंद्र शेळके, उपनिरीक्षक रोहित चौधरी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्याला लाऊडस्पीकरवरून खाली उतरण्याची वारंवार विनंती करण्यात आली. पण तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
दुपारी सव्वाचारच्या सुमारास त्याने हाताने इशारा करून मोबाईल फोन करण्याची खूण केली. त्यानंतर अग्नीशमन अधिकारी देसाई यांनी त्याच्या मोबाईलवर फोन केला. त्यावेळी त्याने आर्मीत भरतीचे पत्र दिल्याशिवाय खाली उतरणार नाही, असा पवित्रा घेतला. त्याला पत्र देण्याचे आश्वासन देण्यात आल्यावर तो पाचच्या सुमारास खाली उतरला. त्यानंतर सर्व यंत्रणांनी सुटकेचा निश्वास सोडला.
त्याला त्यानंतर तातडीने शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेले. तेथे त्याची चौकशी करण्यात आली. त्याच्या भावालाही पोलिसांनी बोलावून घेतले होते. त्यानंतर त्याची समजूत काढून रात्री उशिरा त्याला त्याच्या भावाच्या ताब्यात देण्यात आले. सातत्याने प्रयत्न करूनही आर्मीत भरती होत नसल्यानेच आपण हे कृत्य केल्याचे त्याने पत्रकारांना सांगितले.