पुणे : प्रतिनिधी
पुरंदर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याने या परिसरातील जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अनेकजण शेतकर्यांकडून कमी भावात जमिनी घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान टाळण्यासाठी विमानतळासाठी निश्चित करण्यात आलेल्या 2300 हेक्टर जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार थांबविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी बुधवारी (दि.23) पत्रकार पररिषदेत दिली.
पुणे शहर आणि जिल्ह्यात रिंगरोड, नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रोच्या तीन मार्गिका आणि ‘पीएमआरडए’कडून राबविण्यात येत असलेल्या टीपी स्किममुळे जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे जमिनींची खरेदी विक्री वाढली आहे. आता पुरंदर येथील विमानतळाच्या कामाने वेग घेतल्याने, बांधकाम व्यावसायिक आणि अनेक बड्या मंडळींनी जमिनींमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी सुरु केली आहे.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी) भूसंपादनाचा प्रस्ताव प्राप्त होताच, जिल्हा प्रशासनाकडून विनातळासाठी जमीन संपादीत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. विमानतळासाठी ज्या शेतकर्यांची जमीन घेतली जाणार आहे, त्यांना मागील तीन वर्षांतील चालू बाजार मूल्याकंनाची (रेडीरेकनर) सरासरी काढून परतावा दिला जाणार आहे. -नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी