पुढारी : पुढारी ऑनलाईन
देशाची अखंडता आणि एकतेसाठी कलम ३७० हटविणे ही काळाची गरज बनली होती, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी बुधवारी केले. कलम ३७० हटवण्याचा निर्णय जातीयवादी नसून तो सुरक्षेच्या आवश्यक होता, असेही नायडू यांनी सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे.
जम्मू काश्मीर राज्यासाठी ज्यावेळी कलम ३७० लावण्यात आले होते, त्यावेळी हे कलम तात्पुरते असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले होते, असे सांगतानाच नायडू यांनी देशाच्या अंतर्गत विषयात ढवळाढवळ करण्याचा कुणालाही अधिकार नसल्याचा इशारा दिला.
कलम ३७० हटवण्यात आल्यामुळे पूर्ण देशात आनंदाचे वातावरण असल्याचे सांगून नायडू पुढे म्हणतात की, या कलमाचा संदर्भ देऊन पश्चिमेकडील देशातील काही प्रसारमाध्यमे चुकीची माहिती पसरवित आहेत. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी कलम ३७० तात्पुरते असून हे कलम घटनेत कायमचे राहू शकत नाही, असे सांगितले होते.
देशाच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत आपण सर्वांनी जातपात, लैंगिक असमानता, गरिबी, निरक्षरता यासारख्या कुप्रथा संपविण्याचा निर्धार केला पाहिजे, असा संदेशही उपराष्ट्रपती नायडू यांनी दिला आहे.