मुंबई : पुढारी ऑनलाईन
कोकणात होऊ घातलेला नाणार येथील ग्रीन रिफायनरीचा विनाशकारी प्रकल्प शिवसेना खासदार आणि केंद्रीय मंत्री अनंत गीते, खा. विनायक राऊत यांनीच आणला. यात शिवसेनेच्या नेत्यांनी व मंत्र्यांनी मोठ्याप्रमाणात पैसे घेतले आहेत. तसेच शिवसेनेचे लोकच यात शेतकऱ्यांच्या जमिनी देखील जबरदस्तीने खरेदी करत आहेत. त्याला विरोध करणाऱ्याना उद्धव ठाकरे मातोश्रीवर बोलावून धमक्या देत, असल्याचा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला.
नाणार येथील ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणातील आंबा, काजू, नारळ, भात पिकावर मोठा परिणाम होणार आहे, त्यामुळेच राजापूर, देवगड येथील 18 गावातील लोकांनी या प्रकल्पास विरोध केला आहे. शेतकऱ्यांच या प्रकल्पामुळे नुकसान होत असताना राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशाने जबरदस्तीने जमिनी ताब्यात घेतल्या जात आहेत. दुसरीकडे शिवसेना या प्रकल्पाला विरोध करत आहे. हा दुटप्पीपणा असून शिवसेनेचा विरोध केवळ दिखाऊपणा असल्याची टीका राणे यांनी केली.
कोकणची राखरांगोळी करणारा नाणार रिफायनरी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. या संदर्भात आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे राणे यांनी सांगितले.
राणेंनी हा प्रकल्प पडीक जमिनीवर नाही तर आंब्याच्या बागांवर आणला आहे. २२,४२० एकर लागवडीखालील जमीन या प्रकल्पात जाणार आहे. या प्रस्तावित जमिनीवर ७ लाख आंब्याची तर २ लाख काजूची झाडे आहेत. या रिफायनरीच्या प्रकल्पाचे सांडपाणी समुद्रात सोडण्यात येणार आहे त्यामुळे या भागातील मासेमारीही प्रभावित होणार आहे, अशी माहिती राणेंनी पत्रकार परिषदेत दिली.