मुंबई : प्रतिनिधी
मंत्रालयातून उंदीर निर्मूलनाची मोहीम हाती घेण्यात आली असली तरी काही सुष्ट, पुष्ट व दुष्ट उंदीर अजून आहेत. ते अनेक योजनांना लागल्याचे सांगून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी, हे उंदीर 2019 मध्ये सिंहासन कुरतडल्याशिवाय रहाणार नाहीत, असा इशारा सरकारला दिला. म्हणूनच राजा, तू जागा हो असे सांगावेसे वाटते असेही ते म्हणाले.
अंतिम आठवडा प्रस्ताव मांडताना विखे पाटील म्हणाले की, 3 लाख 19 हजार 400.57 एवढे उंदीर मारण्यात आले असले तरी काही उंदरांचा मंत्रालयातील हैदोस अजून सुरूच आहे. काही काही उंदीर हे बेडकासारखे फुगून मस्तवाल झाले आहेत, तर काही नुकतेच जन्माला आले आहेत, काही कृश आहेत.
मंत्रालयातील काही उंदरांची कहाणी सांगताना विखे यांनी, काही उंदीर हे शेतकर्यांच्या कर्जमाफीचा निधी कुरतडत आहेत, तर काही उंदीर हे अन्न व नागरी पुरवठा खात्यात जनतेच्या तूर, तांदूळ, गहू, सोयाबीन व कापसावर ताव मारत आहेत, काही उंदीर हे कुपोषित बालकांचा पोषण आहार फस्त करत असून काही उंदीर आदिवासी मुलांचे स्वेटर व रेनकोट कुरतडत आहेत.
श्री गणेशाची मोठ्या वाजतगाजत प्रतिष्ठापना होत असली व तो मान पुण्याचा असला तरी पुण्यातील काही उंदीर हे भलतेच बुद्धिमान व बेरकेही आहेत. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला की ते लगेच पुणेरी पगडीखाली जाऊन बसतात. या उंदरांचा धोका पेशवाईतील नाना फडणवीसांना झाला नसला तरी आजच्या फडणवीस सरकारने हा धोका ओळखून तातडीने या चतुर उंदरांना जेरीस आणण्याची गरज आहे, असे विखे म्हणाले.
Tags : mumbai news, Radhakrishna Vikhe Patil, BJP, NCP, Mouce Froud, Mantralay, Mumbai
May 06 2018 2:08AM
May 06 2018 2:08AM
May 06 2018 2:01AM
May 06 2018 2:00AM
May 06 2018 2:01AM
May 06 2018 2:01AM