मुंबई : प्रतिनिधी
दलित पँथरचे प्रमुख संस्थापक राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले एक वादळी व्यक्तिमत्व आपण गमावले असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
दलित पँथरचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांचे निधन झाले. आज, मंगळवार (दि १६) सकाळी विक्रोळी येथील निवासस्थानी त्याची प्राणज्योत मालवली. राजा ढाले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुःखाचा डोंगर कोसळला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या विषयी भावना व्यक्त करत श्रध्दांजली वाहली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राजा ढाले हे समतेसाठीच्या चळवळीतील एक अभ्यासू आणि ध्येयवादी व्यक्तिमत्व होते. दलित पँथरच्या माध्यमातून समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांच्या आकांक्षांना त्यांनी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ही चळवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व आहे. सत्तरीच्या दशकात या चळवळीने केलेला संघर्ष आंबेडकरी चळवळीला एक नवा आयाम देणारा ठरला होता आणि त्यातील राजा ढाले यांचे योगदान अतिशय मोलाचे होते. त्यांच्या निधनाने एक लढाऊ नेता, प्रतिभावंत साहित्यिक आणि परिवर्तनवादी चळवळीचा महत्त्वाचा भाष्यकार आपण गमावला असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
तर याबरोबरच राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी ढाले यांच्या घरी जात ढाले परिवाराचे सांत्वन केले. पॅंथरचा एक धगधगता अंगार हरपला आहे, अशा शब्दात महातेकर यांनी त्यांना आदरांजली वाहिली. ढाले यांच्या आंबेडकरी विचारांनी प्रेरित झालेल्या धगधगत्या विचारातूनच महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली आणि त्या प्रेरणेतूनच अनेक नेते घडले, प्रचंड बुद्धिमत्ता असलेला नेता, विचारवंत आपल्यातून गेला आहे. याबद्दल मला तीव्र वेदना होत आहेत, असे महातेकर म्हणाले.