आष्टी : प्रतिनिधी
परतूर तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेेचे गाव असलेल्या आष्टी येथील बसस्थानकाचा विस्ताराचा प्रश्न मार्गी लागला आहे. रूरबन योजनतून हे काम केले जाणार आहे.
बसस्थानकाच्या विस्तारासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून मागविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात एकही निविदा खरेदीदार आला नाही. मात्र दुसर्या टप्प्यात चार जणांच्या निविदा राज्य परिवहन महामंडळाच्या औरंगाबाद कार्यकारी अभियंता कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. लवकरच बसस्थानकातील अतिक्रमण हटवून कामास सुरुवात होणार आहे.
जालना, परभणी आणि बीड या तीन जिल्ह्याच्या केंद्रस्थानी असलेल्या आष्टी बसस्थानकात परिसरातील 40 गावांतील प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. मात्र बसस्थानक नसल्याने प्रवाशांचे हाल होतात. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नाने आष्टी गावाचा केंद्र सरकारच्या डॉ. शामाप्रसाद मुखर्जी रूरबन योजनेत समावेश झाल्याने बसस्थानकासाठी एक कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यकारी अभियंता कार्यालय औरंगाबाद यांच्यामार्फत पहिल्या टप्प्यात होणार्या 80 लाख रुपयांच्या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या.