अंबाजोगाई : प्रतिनिधी
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वावलंबन योजनेची रक्कम दुप्पट तर अनुदान शंभर टक्के करण्यात यावे या करिता आ. ठोंबरे यांनी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. त्या प्रयत्नाला आता यश आले आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना शेत जमीन खरेदी करण्यासाठी आता चार एकर कोरडवाहूसाठी वीस लाख तर दोन एकर बागायती शेतीसाठी 16 लाख रुपये देण्याचा, तसेच या रकमेवर तब्बल 100 टक्के अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेची राज्यात मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी होईल, असा विश्वास आ. संगीता ठोंबरेनी व्यक्त केला.
राज्यात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना राबवण्यात येते, मात्र चार एकर कोरडवाहू जमीन प्रत्येकी तीन लाख रुपयांप्रमाणे किंवा दोन एकर बागायती जमीन राज्यात कुठेही उपलब्ध होत नाही. पूर्वीच्या योजनेत लाभार्थ्याला सामाजिक न्याय विभागाकडून 50 टक्के अनुदान तर 50 टक्के कर्ज देण्याची योजना होती, मात्र इतक्या कमी किंमतीने शेत जमिन मिळणे कठीण होते.
त्यामुळे योजना चांगली असूनही या घटकांच्या आर्थिक उन्नतीच्या योजनेला अल्प प्रतिसाद मिळत होता. राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांपैकी 95 टक्के लोक भूमिहीन तर उर्वरीत अल्पभूधारक आहेत. त्यामुळे त्यांना शेतीच्या रोजंदारीवरच अवलंबून रहावे लागते, मात्र शेतीवरील कामेही वर्षातील काही महिनेच उपलब्ध असल्यामुळे या घटकांच्या मूलभूत प्राथमिक गरजाही पूर्ण करण्यात अडचणी येतात.
त्यामुळे त्यांना शेतीचे साधन उपलब्ध झाले तर त्यांचा आर्थिक विकास होईलच शिवाय त्यांच्या भावी पिढीची सामाजिक, शैक्षणिक तसेच सांस्कृतिक प्रगतीही होण्यास हातभार लागेल, असे मत आ. संगीता ठोंबरे यांनी व्यक्त केले.