रत्नागिरी : शहर वार्ताहर
सन 1986 पासून रोजंदारीवर असलेल्या सफाई कामगारांना कायमस्वरूपी करावे, यासाठी गुरूवारी रत्नागिरीचे आ.उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली नगरविकास मंत्री रणजित पाटील यांच्याकडे विधानभवनात बैठक पार पडली.
या बैठकीला मुख्याधिकारी अरविंद माळी, अनिल जाधव, लक्ष्मण कोकरे, अवि जाधव हे सफाई कामगारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत 1993 पर्यंतचे सफाई कामगार कायम करावे. हा नियम बदलून सन 2000 पर्यंतच सफाई कामगार कायम करावे. या मुख्यमंत्र्यांचा सूचनेचा पाठपुरावा 15 दिवसात करून महाराष्ट्रातील सुमारे 2000 सफाई कामगारांना न्याय देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.
रत्नागिरी नगरपरिषदेतील तीन सफाई कामगारांनी आ. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या पाठपुराव्याला यश आले. त्यामुळे त्यांच्यासोबतच महाराष्ट्रातील सुमारे 2000 सफाई कामगारांना आता कायम घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रत्नागिरीचे लोकप्रिय आ. उदय सामंत यांनी या कामगारांचा प्रश्न शासनाच्या दरबारी मांडल्याने सफाई कामगारांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.