रत्नागिरी : प्रतिनिधी
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रधान कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन बुधवारी (दि. 14) होत आहे. या समारंभाला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या घडामोडी आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रत्नागिरीतील आगमनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
बँकेच्या जयस्तंभ येथील मुख्य कार्यालयाची इमारत जुनी झाल्याने तसेच बँकेचा विस्तारही वाढल्याने या वर्षी नवीन इमारत बांधण्यात आली. या इमारतीचे उद्घाटन दि. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वा. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी पर्यावरणमंत्री ना. रामदास कदम, पालकमंत्री रवींद्र वायकर, म्हाडा अध्यक्ष आ. उदय सामंत, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खा. विनायक राऊत, सुनील तटकरे, हुसेन दलवाई, को-ऑपरेटिव्ह बँक्स युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसुळ आदी उपस्थित राहणार आहेत.
जिल्ह्यात मागील काही महिने राष्ट्रवादी पक्षात अनेक घडामोडी घडल्या आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पक्षअध्यक्षांच्या रत्नागिरीला दौर्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.