खेड : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एवढी श्रद्धा, आपुलकी व प्रेम केवळ कोकणच्या लाल मातीतच पाहायला मिळते, असे प्रतिपादन राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी येथे केले. बुधवारी तालुक्यातील रसाळगडावर श्री देवी वाघजाई व झोलाईच्या त्रैवार्षिक यात्रौत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यात्रेसाठी संपूर्ण राज्यातून सुमारे तीस हजार भाविक उपस्थित होते. रसाळगड परिसरातील सुमारे 30 हून अधिक गावांतील ग्रामदेवतांच्या पालख्या गडावर पोहोचल्या. छत्रपती शिवाजी महाराज, झोलाई व वाघजाई देवीच्या नावाचा जयघोषाने भाविकांनी आसमंत दणाणून सोडले होते.
या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रयत्न केले. युवा सेना राज्य कोअर समिती सदस्य योगेश कदम, जि. प. सभापती चंद्रकांत कदम यांच्यासह पदाधिकारी, व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ना. कदम म्हणाले, महाराष्ट्राच्या सर्व भागात मी फिरलो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांशी एकनिष्ठ असलेला मावळा हा कोकणातच आहे.
रसाळगडावर वीज पोहोचवण्यासाठी सात दिवसांत 120 खांब उभे करण्याचे काम आम्ही केले. संपूर्ण राज्यात सरकारी खर्चाने ज्या गडाच्या डागडुजीचे काम सुरू झाले ते रसाळगडाचे. त्यासाठी मला काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. या गडाच्या विकासासाठी सात कोटी रूपये मंजूर घेण्यासाठी येथील जनतेच्या पाठींब्याचे भक्कम पाठबळ मला होते म्हणून हे शक्य झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणतीच जातपात पाहिली नाही. देशात अठरा पगड जातींना सोबत घेऊन खर्या अर्थाने पहिली लोकशाही महाराजांनी आणली.दिल्लीच्या दरबारातून ताठमानेने निघून जाणार्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांचा विचार करून त्यांना आधी गनिमी काव्याने निघून जाणे पसंत केले, असे छत्रपती पुन्हा होणे नाही, असे ते म्हणाले.
Tags : Kokan, Chatrapati Shivaji Maharaj, Ramadas Kadam ,Khed, Ratnagiri