कोल्हापूर : प्रतिनिधी
ईशान्य भारतातील त्रिपुरा व नागालँड या राज्यांत प्रथमच भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आहे. विजयाप्रीत्यर्थ भारतीय जनता पक्षातर्फे शिवाजी चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. आनंदोत्सव साजरा करण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, सरचिटणीस अशोक देसाई, महापालिका स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांच्या उपस्थितीत साखर व पेढे वाटून तसेच फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी पालकमंत्री पाटील म्हणाले, ईशान्य भारतात भाजपची सत्ता येणे हे खर्या अर्थाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या विकासाचे फळ आहे. सबका साथ, सबका विकास, हा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशामध्ये सामान्य नागरिकांचे, गोरगरीब शेतकर्यांचे जीवनमान कसे उंचावेल याचा ध्यास घेत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक राजकारणातून संपूर्ण देशामध्ये विकासाची गंगोत्री आणली आहे. स्वातंत्र्यानंतर ईशान्येकडील सात राज्ये सातत्याने दुर्लक्षित राहिली होती परंतु मोदीजींनी या राज्यांकडे विशेष लक्ष देऊन पायाभूत सुविधा, नवीन रोजगार, सेंद्रिय शेती इत्यादी रचनात्मक कामातून येथील नागरिकांना उज्ज्वल भविष्याची खात्री दिली.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, सयाजी आळवेकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.