कागल : प्रतिनिधी
जातीयवादी शक्तीवर प्रहार करीत रुढी, परंपरा व अनिष्ठ चाली रितीवर फटकारे मारत कागलमध्ये संभाजी भगत यांचा विद्रोही आसूड कडाडला. महामानवांना वंदनासाठी विविध गीते गात ढोलकी, टाळ, आणि पहाडी आवाजांनी गैबी चौक दणाणून गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाच्या श्ाुभारंभी प्रसंगी सुप्रसिद्ध शाहीर संभाजी भगत यांचा प्रबोधनाचा जागर कागलमध्ये झाला.
कोल्हापूर बद्दल बोलताना शाहीर संभाजी भगत म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आधी शाहू महाराजांनी ओळखले असल्याचे स्पष्ट करीत लता मंगेशकर, आशा भोसले, आणि उषा मंगेशकर यांच्या पासून सुरू केलेला त्यांचा जागर राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत आणून पोहोचविला. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश या गाण्याचा विद्रोही समाचार घेताना ते म्हणाले, मग आम्ही कुठे उभे आहोत. भक्तिगीते नकोत मुक्ती गीते गा ते पुढे म्हणाले, जे साहित्य तुम्हाला सत्याकडे घेऊन जात नाही ते साहित्य तुमची मुक्ती कधीच करू शकत नाही. इतिहासात विष पेरणार्याकडून छ. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास दडवून खोटा इतिहास सांगितला जात आहे. निवडणुका तोंडावर आल्या की, ज्यांना देवदेवतांची आठवण फारच येते त्यांना झोलर आणि सोलर असे त्यांनी संबोधले. निवडणुकीतील मतदान यंत्रामुळे लवकरच लोकशाहीचाच मृत्यू होईल असे ते म्हणाले.
ऐश्वर्या रॉय विश्वसुंदरी मानले जाते. परंतु, सौंदर्याच्या संकल्पना चुकीची आहे. देशात केवळ साडेतीन टक्के लोकच गोरे आहेत तरीसुद्धा या सगळ्यांच्या सौंदर्याच्या संकल्पना या गोरपणाच्याच आहेत. ज्याचे हात मातीत आणि कपाळावर घाम अशा काबाडकष्ट करणार्या माझ्या गावगाड्यातील भगिनीच या जगात सुंदर असेही ते म्हणाले.
यावेळी मुंबईच्या रमाबाई आंबेडकर नगरातील रहिवाशी असलेल्या ऐश्वर्या जाधव यांचे ‘संपविला देह जरी संपणार नाही गती, धर्माच्या गारद्यांनो कशी रोखणार गती’ हे गीतमय भाष्य प्रभावी ठरले यावेळी बाबासाहेब आटखिळे, विशाल पारदे, महेश लोखंडे, नीलेश तायडे, गोविदराव निकम, शाहीर सदाशिव निकम सिद्धनेर्लीकर हे यावेळी सहभागी झाले होते. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, नगराध्यक्षा सौ. माणिक माळी, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, प्रकाश गाडेकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित हेाते.
Tags : Shahir Sambhaji Bhagat, kolhapur kagal