जालना : प्रतिनिधी
राज्यमंत्री सामजिक न्याय आणि विशेष सहाय्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी (दि.12) रोजी शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाधिकार्यांसोबत सामाजिक न्याय विभागाच्या योजना तसेच विविध महामंडळे यांच्या कामाबाबत आढावा बैठक घेतली.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा आरोरा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक लता फड, सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त शिंदे व विविध विभागांचे खातेप्रमुख यांची उपस्थिती होती.
आठवले यांनी सर्व शासकीय योजनांचा आढावा घेतला. सर्व कार्यालयातील विविध मंडळातील अधिकार्यांना मंडळामार्फत देण्यात येणार्या कर्जाविषयी माहिती घेतली व तसेच त्यांनी जास्तीत जास्त लाभार्थी कर्ज प्रकरणे मंजूर करावी, जे व्यवसायासाठी कर्ज घेतले त्यांची खात्री करावी, तसेच लाभार्थ्यांकडून वसुलीचे प्रमाण वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावे तसेच पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेबाबत सतर्क राहावे, विद्यार्थीं व विद्यार्थिनींना वेळेवर शिष्यवृत्ती मिळेल यासाठी जून व जुलैपर्यंत अर्ज पूर्ण करून तत्काळ कार्यवाही करावी, जेणेकरून कोणीही शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, अशा सूचना अधिकार्यांना दिल्या. यावेळी माजीमंत्री शंकराव राख, अॅड. ब्रह्मानंद चव्हाण, गणेश रत्नपारखे, मिलिंद शेळके, बाबूराव खरात, सतीश वाहुळे आदींची उपस्थिती होती.