औरंगाबाद : प्रतिनिधी
नारेगाव येथील कचरा डेपोमधील कचर्याची बायोमायनिंग पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे मनपाने ठरविले आहे. त्यासाठी गुरुवारपासून पोकलनेच्या साह्याने ठराविक आकाराचे कचर्याचे ढीग तयार करण्याच्या कामास सुरुवात झाली. या कामाकरिता जिल्हा प्रशासनाने मनपाला दोन पोकलेन उपलब्ध करून दिले आहेत.
मनपाचा नारेगाव येथील कचरा डेपो हटविण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे कचरा डेपोसाठी पर्यायी व्यवस्था होत नसल्याने मनपा प्रशासन अडचणीत आले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आणि ग्रामस्थांचा रोष कमी करण्यासाठी मनपाने गुरुवारपासून या कचरा डेपोत दोन पोकलेनच्या साह्याने कचर्याचे छोट्या छोट्या आकाराचे ढीग तयार करण्यास सुरुवात केली. मनपा आयुक्त दीपक मुगळीकर यांनी सांगितले की, कचरा डेपोत मोठ्या प्रमाणावर कचरा साठलेला आहे.
या कचर्याचे केमिकलच्या मदतीने विघटन करण्यात येईल. त्याला बायोमायनिंग असे म्हणतात. त्यासाठी आधी छोट्या छोट्या आकाराचे ढीग तयार केले जात आहे.
डीपीआरचे काम सुरू
कचरा विघटनाच्या कामाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे इंदोर येथील पीएमसीला दिले आहे. त्यांचा डीपीआर तयार होताच स्मार्ट सिटीतून निविदा काढण्यात येईल, असे मनपा आयुक्तांनी सांगितले.