- विधिशा देशपांडे
अंजीर या फळाचा उल्लेख पुरातन ग्रंथांमध्ये आढळतो.उन्हाळा व पावसाळा या दोन्ही ऋतूंत अंजिराचा सीझन असतो. उन्हाळ्यात येणारे अंजीर गोड असते. अंजिरातून शरीराला लोह, व्हिटॅमीन्स ए, बी, सी बर्याच प्रमाणात मिळते. तसेच शर्करा भरपूर प्रमाणात मिळते.
अंजीर खायला थंड व पचायला जड असतात. यांच्या सेवनाने गॅसेसची तक्रार दूर होते. पित्त विकार, रक्तविकार व वात विकार यातील औषधी गुणधर्मामुळे दूर होतात. अपचन, अॅसिडिटी, गॅसेसचा त्रास होणार्या व्यक्तींनी दररोज सकाळ, संध्याकाळ 1 ते 2 अंजीर खावीत किंवा याचा रस प्यावा. वरील त्रासापासून आराम मिळेल.
अंजीर खाल्ल्यांनी बौद्धिक व शारीरिक थकवा दूर होण्यास मदत होते. लघवीचा त्रास होत असल्यास दिवसातून तीन—चार अंजीर नियमितपणे खावीत. यामुळे मूत्रविकार दूर होतात. अशक्त व्यक्तींनी अंजिराचा रस अथवा खाल्ल्याने गुणकारी परिणाम होतात. त्वचा विकार, त्वचेची आग होणे व कांजण्या या आजारांत आराम पडण्यासाठी अंजीर खावीत. दररोज कोणतेही एक फळ खाल्ल्याने शरीर निरोगी नक्कीच बनते. अंजीर खाल्ल्याने अजीर्णाचा त्रास कमी होतो. अंजीर शक्तिवर्धक आहे. तसेच ते सारकही आहे. म्हणजे, ओली किंवा सुकी दोन अंजिरे झोपण्याच्या वेळी खाऊन पाणी प्यावे. थोड्याच दिवसांत अजीर्णाची तक्रार दूर होते.